रात्रीच्या जेवणांतरची आवराआवर किंवा स्वच्छता हा रोजच्या स्वच्छतेमधला एक अविभाज्य भाग आहे. बऱ्याच जणांना जेवणानंतरची आवराआवर हा एक कंटाळवाणा भाग वाटतो परंतू रात्री जर आवरलेलं नसेल तर सकाळी उठल्या उठल्या खरकटं आवरायचं, पसारा आवरायचा जास्तच कंटाळा येतो आणि सकाळी उठल्यावर प्रसन्न वाटत नाही. माझी आई म्हणते, “स्वयंपाक करायचा जेवढा कंटाळा येत नाही तेवढा नंतरचं सगळं आवरायचा येतो. एकदा जेवण झालं की माझ्याकडून नंतरचं काहीही आवरलं जात नाही.” ह्याच कारणामुळे जेवणांतरची आवरावर करण्याची जबाबदारी आईने माझ्याकडे टाकली होती. तेव्हापासून जेवणानंतरचं आवरून घ्यायची सवय लागली आणि अर्थातच आता त्याचा खूप उपयोग होतो. तेव्हा आता वळूया जेवणानंतरच्या आवराआवरीकडे.
मी ऑफिसमधून घरी आले की आधी कुकर लावते. कुकर होईपर्यंत घरात फेरफटका मारून वरवर दिसणारा पसारा आवरते म्हणजे सोफ्यावरच्या उश्या नीट करणे, कुठे चिठ्ठ्या चपट्या असतील तर त्या उचलून ठेवणे किंवा धुतलेल्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवणे वगैरे. मग उरेलेल्या स्वयंपाकाच्या मागे लागते. ऑफिसमधून आलेली असल्याने भूक लागलेली असतेच त्यामुळे पटकन जेवायला बसतो. जेवण झालं की:
- जेवायला बसताना घेतलेलं पाण्याच भांडं, तांब्या, तुपाचं भांडं, चटण्या/लोणच्याची बरणी जागेवर ठेवून देते.
- उरलेलं अन्न योग्य आकाराच्या भांड्यात काढून ठेवते (योग्य आकाराच्या असं मुद्दाम म्हणाले कारण गरजेपेक्षा जास्त मोठ भांडं घेतलं तर फ्रीजमधील जागा उगाच अडून राहते आणि लहान भांडं घेतलं तर फ्रीजमधून भांडी काढताना ठेवताना सांड-लवंड होण्याची शक्यता असते) आणि मग भांडी घासायला टाकते.
- जेवणाची ताटं, खरकटी भांडी सिंक मध्ये एकत्र करून ठेवते आणि मग पाण्याने विसळते किंवा त्यातलं खरकटं काढून टाकते. (आम्हाला दोघांनाही वाढलेलं पान अगदी चाटून पुसून स्वच्छ करायची सवय आहे. त्यामुळे नुसतं पाण्याखाली धरते पण इतर कोणी जेवले असेल तर बऱ्याचदा खरकट जमा झालेलं असल्यामुळे भांड्यांमधलं खरकट बाजूला काढून ते ओल्या कचऱ्यात टाकते आणि मग भांडी थोडी विसळून एकत्र करून ठेवते. भांडी विसळली नाहीत तर त्यातले अन्नाचे कण वाळून जातात आणि मग भांडी घासायला त्रास होतो आणि अन्नाचे कण असल्याने त्याचा वास यायला सुरुवात होते. घरात झुरळं व्हायला सुरुवात होऊ शकते.) भांडी एकत्र करून किंवा एकात एक घालून ठेवायचा मला प्रचंड कंटाळा येतो पण ते नाही केले तर पूर्ण सिंक भरून जातं, पसारा होतो आणि सकाळी आमच्या मावशींना भांडे घासताना त्रास होतो. पाणी पिण्याची भांडी/ग्लास, किंवा उद्याच्या स्वयंपाकाला लागणारं एखादं भांडं किंवा पोळपाट लाटणं / तवा वगैरे घासून, स्वच्छ करून, पुसून जागच्या जागी ठेऊन देते. सकाळी एवढ्या मोठ्या भांड्यांमधून लागणारं भांडं शोधून काढायचं आणि ते स्वच्छ करायचं हे मला फार त्रासदायक वाटतं. कणिक भिजवलेली परात किंवा कणकेचं भांडं, भातचं भांडं हे लवकर वाळून जातं. त्यामुळे अश्या भांड्यात पटकन पाणी घालून ठेवते म्हणजे ते लवकर स्वच्छ होतात. जर तुमच्याकडे डिशवॉशर असेल तर ते जेवण झाल्या झाल्या लगेच लावावं म्हणजे इतर सगळी कामं होईपर्यंत भांडी घासून पूर्ण होतात.
- आपण जेवताना किंवा वाढून घेताना कधी कधी अन्नाचे कण किंवा भाताचं एखादं शीत पडलेलं असतं त्यामुळे असं सांडलेलं खरकटं किंवा अन्नाचे बारीक कण उचलून ओल्या कचऱ्याच्या डब्यात टाकते. त्यानंतर ज्या भागात जेवायला बसलो असू तो भाग स्वच्छ पुसून घेते. जर डायनिंग टेबलवर जेवायला बसलो असू तर टेबलाची काच कोलीनने स्वच्छ पुसून घेते आणि त्यासोबत टेबलमॅट पण पुसून घेते. दोन्ही पुसून झालं की थोडा वेळ टेबल वाळू देते आणि मग त्यावर पुन्हा टेबलमॅट ठेवते.
- आम्ही माठात पाणी भरून ठेवत नाही पण माझी आई, तिचा टेबल आवरून झाला की माठामध्ये राहिलेलं पाणी तांब्यात ओतून तो तांब्या टेबलावर ठेवते आणि मग माठ स्वच्छ विसळून पाणी भरून ठेवते.
- स्वयंपाक करताना कधी कधी ओट्यावर पसारा होतो. स्वयंपाक करताना धान्याचे किंवा मसाल्याचे डबे बाहेर काढलेले असतात ते सगळं जागच्या जागी ठेवते.
- उद्या सकाळच्या स्वयंपाकासाठी काही तयरी करायची असेल म्हणजे काही वाटण वाटायचं असेल, भाज्या निवडून ठेवायच्या असतील किंवा कोणत्याही प्रकारची तयारी असल्यास ते करून ठेवते. अर्थात जास्त उशीर झाला असेल तर मग मात्र आम्ही मिक्सर वापरत नाही. (जोरात आवाज येणारी कोणत्याही प्रकारची उपकरणं रात्री १० नंतर आम्ही शक्यतो वापरत नाही). दही संपलं असेल तर विरजण लावून ठेवते.
- ओट्यावरचा सगळा पसारा उचलला की मग त्यावर पडलेले अन्नाचे कण उचलून ओल्या कचऱ्याच्या डब्यात टाकते. एखाद्या ठिकाणी डाग पडला असेल तर तो सगळ्यात आधी विशेष लक्ष देऊन काढते. त्यानंतर गॅसची शेगडी स्वच्छ पुसून घेते आणि मग उरलेला संपुर्ण ओटा पुसून घेते. काही जणींना संपुर्ण ओटा रोज धुवायची सवय असते. अगदी खरं सांगायचं तर ह्या गोष्टी आपल्या सवयींवर, उपलब्ध असणाऱ्या वेळेवर आणि वापरावर अवलंबून असतात. त्यामुळे जर ओटा खूप खराब होत असेल तर तो रोज स्वच्छ करावा लागतो.
- ओट्याची स्वच्छता झाली की मग सिंककडे जायचं, सिंकच्या जाळीमध्ये अन्नाचे कण अडकलेले असतात ते सगळं काढून ओल्या कचऱ्याच्या डब्यात टाकते. त्यानंतर सिंक आणि त्यातली जाळी स्वच्छ घासून ठेवते. सिंक स्वच्छ करत असताना सिंकमधील नळसुद्धा स्वच्छ करते.
- दिवसभरात खूप वेळा सगळ्या जणांनी फ्रीजला आणि ओवनला हात लावलेला असतो. कधी खरकटे हात लागलेले असतात त्यामुळे फ्रीजचे आणि ओवनचे हॅन्डल खराब होते, तेवढा भाग पुसून घेते.
- आता स्वयंपाक घरातली आवरावर संपुर्ण झाल्यावर घरतली कचऱ्याची पिशवी बाहेर नेऊन ठेवते आणि कचऱ्याच्या डब्याला नवीन पिशवी लावून ठेवते. पूर्वी कचऱ्याच्या डब्यासाठी म्हणून खास काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या जाड पिशव्या मिळत असत. आता महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी असल्याने त्या उपलब्ध होत नाहीत पण त्या ऐवजी दुसऱ्या प्रकारच्या (मटेरीअलच्या) पिशव्या बाजारात उपलब्ध होऊ लागल्या आहेत.
- हात पुसण्यासाठी, ओटा पुसण्यासाठी किंवा भांडी पुसण्यासाठी वेगवेगळे नाप्कीन दिवसभरात वापरले जातात. ते नॅप्कीन दिवसभर वापरून खराब झालेले असतात त्यामुळे ते सगळे धुवायला टाकते आणि नवीन नॅप्कीनचा संच बाहेर काढते.
- सर्व विद्युत उपकरणं, गॅसचं बटण बंद आहे याची एकदा खात्री करून दिवे मालवून टाकते. माझ्या काही मैत्रिणींना रात्री झोपताना फ्रॅग्रन्स डीफ्युजर लावायची सवय आहे. मला स्वतःला ते फारसे आवडत नाही पण तुम्हाला घरामध्ये दरवळणारा मंद वास आवडत असेल तर तुम्ही ते लावू शकता.
रात्रीच्या जेवणानंतरच्या आवराआवरीवरचा हा लेख तुम्हाला कसा वाटला किंवा तुम्ही आणि काय काय करता हे आम्हाला जरूर कळवा. पुन्हा भेटू लवकरच एका नव्या सदरामध्ये.
घ घराचा
धन्यवाद.🙏🏼
Mithila
Khup chan mala napkins badlaychi savay navti so ata athvanin karin te pn
भूमिका
खूप छान माहिती दिली मि सुद्धा किचन असाच स्वच्छ करते